Post on 14 Oct 2019 / Nandkumar Palkar

कचरा व्यवस्थापन आणि भंगारवाले सहभाग

देश स्वतंत्र होऊन ७१ वर्षे लोटली, अनेक राजनैतिक वादळे आलीगेली, या सर्व काळात देशात प्रगतीचे अनेक प्रकारचे वारे वाहिले, खरं पाहिलं तर प्रत्येक राजनैतिक पक्षाला जर जनतेसमोर स्वतःच्या पक्षाची प्रतिमा उजळ किंवा उजवी करायची असेल तर हा प्रगती नावाचा वापर सर्रास करणे अनिवार्य आहे. बरं! प्रगती हि झालीच पाहिजे परंतु आपल्या देशाला एक प्रकारे शाप आहे कि काय? जिथे लोकांना स्वतःला लोकशाहीच्या आड शिस्त सोडून वागण्याची दिलेली मुभाच आहे कि काय?



प्रगतीच्या नावावर वाढत चाललेला उपभोक्तावाद अर्थातच त्या योगे येणारे मॉलस, अनेक उत्पादने, वापरा आणि फेकून द्या इत्यादी गोष्टींचा वाढता प्रभाव हे सर्व वाढत्या लोकसंख्ये बरोबर, वाढत्या शहरीकरणा बरोबर आलंच! पण याला पोसताना आपण पर्यावरण व स्वच्छतेकडे केलेली डोळझाक, दुर्लक्ष हे मोठ्या प्रमाणावर बोचू लागले आहे. काही उदाहरणं, २००५ साली झालेली मुंबईची अवस्था आपल्या सर्वांच्या स्मरणात असेलच. याची अनेक करणं अनेक तज्ज्ञांनी काढली पण या सर्वांचा सूर एकाच होता, तो म्हणजे कचरा!

कचरा होण्याच कारण म्हणजे आपण सर्व या उपभोक्तावादाच्या जाळ्यात पुरते अडकलो आहोत पण त्यातून स्वतःला मोकळं ठेवणं विसरलो, कसं ते पाहू!  

एखाद्या मुलाने चॉकलेट दुकानदाराकडून घेतले तिथेच खाल्ले पण त्याला हे नाही शिकवण्यात आलं कि ते कचऱ्याच्या कुंडीत टाकावे. दुसरे उदाहरण म्हणजे, सिगारेट, गुटखा खाणारे यांच्या कडून सिगारेट, गुटखा पाकिटे, बडीशेप ची पाकिटे, हॉल्स किंवा मिंट ची पाकिटे इत्यादी सर्रास रस्त्यावर टाकले जातात आणि ते सर्व गटारे, नाले तुंबवतात. तिसरे म्हणजे, भाजी घ्यायला जाणारे पिशवी हमखास भाजी वाल्याकडून घेतात आणि मग ती पिशवी कचऱ्यात टाकून दिली कि ती गटारे नाले यात वाहून नेले जातात कारण घरातला कचरा कचराकुंडीत आणि कुंडीतील कचरा फक्त कुंडीत न राहता आजू बाजूला पसरून उक्किर्डे तयार करतो, असे अनेक प्रकार आपल्या कडे सहज घडतात, म सफाई कामगार त्यांना डम्पिंग ग्राउंडवर टाकतात. म्हणजे कचऱ्याला अंत हा नाहीच! आता इथून पुढची प्रगती म्हणजे यंत्रणेचे सक्षमीकरण, नियमांची अंमलबजावणी यात प्रामुख्याने जनतेतील स्वच्छता, कचरा, प्रक्रिया (Process), या बद्दल जागरूकतेचा अभाव, शिस्तीचा अभाव, नियमांची खिल्ली सहज उडवणे इत्यादी दुर्लक्षित गोष्टी. कचरा व्यवस्थापन हे हि एक शास्त्र आहे आणि जर त्यावर विश्वास ठेवला तर त्याचे व्यवस्थापन हे काही रॉकेट सायन्स नाही. अगदी छोट्या मुलापासून ते वायोवृद्धां पर्यंत, गरिबातील गरीब व्यक्तीं पासून ते श्रीमंतीत लोळणाऱ्या, राजकारणात तरंगणाऱ्यां पर्यंत सहज शक्य आहे, तसेच हा एक संस्कार असायला हवा!

कचरा व्यवस्थापनात ओला कचरा व सुका कचरा हे दोन प्रमुख भाग येतात. ओल्या काचऱ्या संदर्भात अनेक उपाय आहेत. जसे घरात आपल्या फुटलेल्या बदली, फुटलेली कुंडी यात हा प्रयोग करू शकतो. अनेक YouTube व्हिडिओज उपलब्ध आहेत. मॅजिक बकेट, पालिकेचे बायोगॅस प्लांट आहेत. सोसायटी स्तरावर अनेक उपाय उपलब्ध आहेत. फक्त इच्छाशक्ती हवी!

मुख्य मुद्दा आहे तो सुक्या कचऱ्याचा, सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणाचा. सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण हे प्रत्येक घराघरांत होणे अत्यंत आवश्यक आहे. या साठी अगदी सोपा उपाय असा कि आपण घरात वेगवेगळ्या पिशव्या कराव्यात. एक पिशवी प्लास्टिक/थर्माकॉल, दुसरी कागद, तिसरी मेटल, चौथी काच आणि पाचवी इतर गोष्टींसाठी यात E-Waste व अन्य गोष्टींचा समावेश करता येईल. आपला जेव्हा जेव्हा वस्तूंचा वापर होईल आणि कचरा निर्मिती होईल तेव्हा लगेच या पिशव्यांमध्ये भरला जाईल. लोकांच्या वापरावर या पिशव्यांचा भरण्याचा कालावधी अवलंबून आहे. प्लास्टिकची पिशवी भरायला एक आठवडा ते तीन आठवडे, कागदाची पिशवी भरायला किमान एक महिना ते तीन महिने लागतील, आणि बाकीच्या पिशव्या भरायला सहा महिने ते एक वर्ष हि लागेल. पिशवीचा आकार हा पाच किलोची पिशवी डोळ्यासमोर ठेऊन सांगितले गेले आहे. कृपया एक नियम मात्र पळावयाचा आहे, मुख्यतः प्लास्टिकच्या काचऱ्या संदर्भात तो म्हणजे प्लास्टिकला जर काही पदार्थ चिकटले असतील तर ते स्वच्छ करूनच पिशवीत भरायचे, तसेच नाही! उदा. जर चॉकलेटचे आवरण किंवा दुधाची पिशवी किंवा हॉटेल मधून मागवलेले पदार्थ काढून झाले आणि त्याला काही पदार्थ चिकटलेले, तेलकटपणा इत्यादी धुवून साफ करून मग त्या पिशवीत भरण्यात यावे. प्लास्टिकचा कचरा भरण्याच्या संदर्भात काही नावीन्यपूर्वक कल्पनाही काहीजण अमलात आणतात ते म्हणजे प्लास्टिकचा कचरा हा प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये ठोसून भरणे ज्याने खूप जागा व्यापली नाही जात तसेच कचरा भरायचा आणि द्यायचा कालावधी वाढतो. आता हे झाले सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण आणि साठवण, पण नंतर काय?

हा प्रश्न अनेक संस्था वेगवेगळ्या प्रकारे हाताळीत आहेत. पण त्याची एकमार्गी व्यवस्था नाही त्यांना कचऱ्याच्या निर्मिती स्थानां पर्यंत, सर्व जनते पर्यंत पोचणे शक्य होत नाही, सुक्या कचऱ्याचे घनफळ (Volume) इतके जास्त आहे, तसेच खूप पसरलेले आहे कि तो सामावून घेणे शक्य होत नाही. काही पालिकांकडे त्या समंधात उपाय योजना आहेत पण ती यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी लागणारी इच्छा शक्ती व प्रक्रिया (Process) यांच्या अभावामुळे पुन्हा कचऱ्याची भर डम्पिंग ग्राउंड वर केली जाते. 

एक मार्ग आपल्या जवळ आहे, तो म्हणजे आपल्या अवती भोवती, प्रत्येक गल्ली-बोळात असलेले भंगारवाल्यांचं जाळं. ह्या भंगारवाल्या बांधावां मार्फत घरोघरी वर्गीकरण केलेल्या सुक्या कचऱ्याला मार्गस्त करता येईल का? यावर काही भंगारवाले बांधवां बरोबर चर्चा केल्या गेल्या, तेव्हा असे जाणवले कि यांच्या कडे याचे उत्तर आहे आणि हि प्रक्रिया एक प्रदीर्घ काळ नियमित केल्यास कचऱ्याचा अंत करणे शक्य आहे. डोंबिवली शहरात या सर्व भंगारवाले बांधवांचं एकत्रीकरण, एक सम्मेलन आयोजित करण्यात आले. जवळ जवळ दोनशे भंगारवाल्यांचा संपर्क केला गेला, त्या सर्वांना रीतसर आमंत्रण पत्रिका देऊन आमंत्रित करण्यात आले. शास्त्री हॉल मध्ये त्यांचे स्वागत "स्वागत किट" देऊन यात श्रीफळ, शाल, गुलाब पुष्प आणि त्यांच्या दुकानात लावण्यासाठीचा फलक "स्वच्छ डोंबिवली अभियान पुरस्कृत " असे देऊन सन्मानित करण्यात आले. या सर्वांना सम्मेलनातं कोणत्या गोष्टींवर चर्चा होणार आहे, मुख्य उद्देश काय आहे याची योग्य माहिती आधीच संपर्क करते वेळी देण्यात आली होती. या बांधावंकडून असे जाणवले कि त्यांच्याकडे सर्व गोष्टींचे उत्तर कमी अधिक प्रमाणात आहे. मुख्य म्हणजे त्यांचे एक जाळे (Network) आहे. या त्यांच्या साखळीचा उपयोग अनेक संस्था, कारखाने, पुनर्चक्रण (Recyclers) इत्यादी करू शकतात आणि योग्य मोबदला त्यांच्या या देशसेवेच्या कार्या बद्दल देऊ शकतात. जर हि यंत्रणा हि समाजव्यवस्था याकडे नीट लक्ष दिलं गेलं तर कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी लक्षणीय उत्तरे मिळतील. संपूर्ण सुका कचरा वर्गीकरण करून एकमार्गी मिळण्याचे जाळे विकसित होईल आणि कोणताही कचरा डम्पिंग ग्राउंडची भर होणार नाही. शहरांमध्ये, गावांमध्ये उक्किर्डे आणि कचऱ्यांचे डोंगर दिसणार नाहीत. 

आता हि व्यवस्था नीट वापरात येण्यासाठी शहरातील/गावांतील नागरिकांनी घरटी सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करणे महत्वाचे आहे. हा कचरा वर्गीकरण केलेल्या पद्धतीने भंगारवाल्यांना देऊन त्याचा पुनर्वापर, पुनर्चक्रण किंवा योग्य विल्हेवाट लावण्यासाठी करू शकतो. फक्त या कचऱ्याच्या मोबदल्यात कोणत्याही नागरिकाने भंगारवाल्यांकडून कोणताही मोबदला मागू नये हि विनंती! यात रद्दी, इतर विक्री योग्य व्यवहार याबद्दल कोणताही आक्षेप नाही. पुढील काळात कचरा वेचकांचे संमेलन घेण्याची योजना आहे, जेणे करून कोणत्याही व्यवस्थेची वाट न बघता नागरिकांनी नागरिकांसाठी चालवलेल्या या स्वच्छता मोहिमेतून आपला परिसर, गाव, शहर, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश स्वच्छ होण्यासाठी आणि कायम स्वच्छ राहण्यासाठी वेळ लागणार नाही!